मुंबई : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या पाचव्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील या फेलोशिप अंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाणार आहे.
कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर इच्छुकांनी १५ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करावेत. १२ ऑक्टोबर २०२५ नंतर स्वीकारले जाणार नाहीत. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी होऊन निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ४०, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ साठी १२ तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण ८२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना सन्मानपूर्वक फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळाल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वर्षी कृषी फेलोशिपमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रद्यानावार आधारित काम करणाऱ्या स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी विशेष संधी निर्माण करत आहोत. जे शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असतील अशा प्रत्येक युवांनी या स्पर्धेत नक्की सहभागी व्हावे. तसेच कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत तरुणांना आपली कल्पकता आणि कौशल्य दाखविण्याची ही सुवर्णसंधी आहे. ही फेलोशिप केवळ आर्थिक मदत किंवा सन्मान नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुणांना मिळालेलं एक सामर्थ्यशाली व्यासपीठ आहे. तुमच्या कल्पना, तुमची ऊर्जा आणि तुमचं स्वप्न या नवपरिवर्तनाच्या प्रवासात सामील करून घ्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व फेलोंचे आभार मानले असून गेल्या चार वर्षात फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. निवड झालेले सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.