
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी सन्मान पुरस्काराची घोषणा आज सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार, ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती चेतना सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणाला २२ जून रोजी ३२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सुळे यांनी सांगितले.
आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका सुनंदा भोसेकर यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', पर्यावरणस्नेही वैशाली घुगे यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', महिलांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मालतीताई सगणे यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’, पत्रकार प्रगती बाणखेले यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, यशस्वी व्यावसायिक प्राची जागुष्टे- महाजन यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’ आणि जिम्नॅस्टिक या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक सविता मराठे यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा रेखाताई नार्वेकर पुरस्कृत 'युवा यशस्विनी पुरस्कार' ॲड. परिक्रमा खोत यांना देण्यात येणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात सकाळी साडे दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या या सातजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देशभरात महाराष्ट्र शासनाने प्रथमच १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून राज्यातील कर्तृत्ववान महिलांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सन्मानित करण्यात येते. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर वरील सात जणींचा सन्मान करण्यात येत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.
नाशिक: "हा देश कोणाच्या मनमर्जीने नाही, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने चालतो. आज २१ या शतकात आपला महाराष्ट्र नेमका कोठे चालला आहे, याचे सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी आजच्या युवा पिढीची आहे. महाराष्ट्राची गेलेली आण, बाण आणि शान परत आणण्यासाठी युवा वर्गाला सोबत घेऊन एक नवी सामाजिक क्रांती घडवण्याची गरज आहे," असे परखड मत चव्हाण सेंटर आयोजित युवा पुरस्कार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार' सोहळा नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा गुणवंतांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी खासदार भास्कर भगरे सर, ॲड. नितीन ठाकरे, गौरव सोमवंशी, अशोक पिंगळे, राजेंद्र डोखळे, सुरेखा बोराडे, विजय गायकवाड, दत्ता बाळसराफ, निलेश राऊत, योगेश कुदळे, संतोष मेकाले, रणजीत बायस, अतुल तांडेल तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या पालकांचे मोठे योगदान असते, असे सांगत त्यांनी आज युवा पुरस्कार मिळालेल्या सर्व तरुणांच्या पालकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. "आपल्या स्वतःच्या यशापेक्षा आपल्या मुलांच्या यशात पालकांना जास्त आनंद असतो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुढे त्या म्हणाल्या की, "आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विज्ञानावर अढळ श्रद्धा होती. त्यांनी नेहमी शिक्षणाला प्राधान्य दिले, कारण समाजात खरी समानता ही केवळ शिक्षणातूनच येऊ शकते. माझी पांडुरंगावर पूर्ण श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. आजची युवा पिढी अंधश्रद्धेकडे जात असल्याचे पाहून चिंता वाटते. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या या महाराष्ट्रात आजही अनेक भोंदू बुवा महिलांचे शोषण करत आहेत, याकडे लक्ष वेधताना, अशा बुवांना आजच्या काळात जेलमध्ये टाकले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर, मग ते ड्रग्ज असो की अंधश्रद्धा, याविरोधात मुख्यमंत्र्यांनी मोहीम काढली तर आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आमची राजकीय लढाई वैचारिक पातळीवर होत राहील, परंतु सामाजिक विषयांवर आम्ही नेहमी एकत्र येऊ, हेच संस्कार आमच्यावर चव्हाण साहेबांनी केले आहेत."
महिलांच्या हक्कांवर बोलताना त्या म्हणाल्या, "आज जर समाजात बुरसटलेले विचार कायम राहिले असते, तर महिला केवळ स्वयंपाकघरातच दिसल्या असत्या. पण, स्वयंपाकघर आणि घर कौशल्याने सांभाळणाऱ्या महिला देशाच्या विकासात तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या त्यागामुळेच आज अनेकजण मोठी यशोशिखरे सर करू शकले आहेत." आज २१ व्या शतकात महिला निर्णयप्रक्रियेत आघाडीवर असल्या तरी स्त्रीभ्रूणहत्येसारखे कलंकित प्रश्न आजही कायम आहेत, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. "आज आपण मुलींना योग्य वेळी 'नाही' म्हणायला शिकवले पाहिजे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. आणि जेव्हा आपण हे करू, तेव्हाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याचा खरा अधिकार असेल," असे त्या म्हणाल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५' नुकताच प्रसिद्ध संशोधक प्रोफेसर डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. १२ मार्च रोजी आयोजित या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. गुप्ता म्हणाले की, "परिस्थितीने गरीब असलेली माणसे ज्ञानाने गरीब नसतात; परंतु समाजात समान संधी उपलब्ध नसल्यास प्रगती खुंटते. संशोधन हे लोकांच्या भाषेत पोहोचले तरच ते सार्थ ठरते. मधमाशा ज्याप्रमाणे विखुरलेले पराग एकत्र करून मध निर्माण करतात, त्याचप्रमाणे मी तळागाळातील लोकांच्या नवोपक्रमांचा शोध घेण्याचे काम केले आहे." स्वयंपाकघरातील भांडी लावण्याच्या पद्धतीवरून संस्कृती ओळखता येते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी चव्हाण सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील ४२ हजार गावांची प्रगती जगासमोर आणण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. हा सन्मान केवळ माझा नसून, शोधयात्रेदरम्यान ज्या सामान्य माणसांनी आपल्या कौशल्याने मला समृद्ध केले, त्या सर्वांचा हा गौरव आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे असून, यासाठी विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डॉ. गुप्ता यांची निवड केली. या निवड समितीमध्ये डॉ. रूपा शाह, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री आणि डॉ. अंकुशराव कदम यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविकातून चव्हाण सेंटरच्या गेल्या चार दशकांतील कार्याचा आढावा घेतला आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी सेंटर कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त नामदार श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी डॉ. गुप्ता यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. गुप्ता यांनी सुचवलेली 'गावे वेबसाईटद्वारे जोडण्याची संकल्पना' आपण स्वतःच्या मतदारसंघापासून राबवण्यास सुरुवात करू, असे त्यांनी जाहीर केले. यशवंतराव चव्हाण हे नेहमीच विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा विचार करत असत आणि तोच वारसा सेंटर पुढे चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला डॉ. अनिल काकोडकर, विवेक सावंत, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अदिती नलावडे, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, निर्मला सामंत-प्रभावळकर, लक्ष्मणराव ढोबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.