
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५' नुकताच प्रसिद्ध संशोधक प्रोफेसर डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. १२ मार्च रोजी आयोजित या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. गुप्ता म्हणाले की, "परिस्थितीने गरीब असलेली माणसे ज्ञानाने गरीब नसतात; परंतु समाजात समान संधी उपलब्ध नसल्यास प्रगती खुंटते. संशोधन हे लोकांच्या भाषेत पोहोचले तरच ते सार्थ ठरते. मधमाशा ज्याप्रमाणे विखुरलेले पराग एकत्र करून मध निर्माण करतात, त्याचप्रमाणे मी तळागाळातील लोकांच्या नवोपक्रमांचा शोध घेण्याचे काम केले आहे." स्वयंपाकघरातील भांडी लावण्याच्या पद्धतीवरून संस्कृती ओळखता येते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी चव्हाण सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील ४२ हजार गावांची प्रगती जगासमोर आणण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. हा सन्मान केवळ माझा नसून, शोधयात्रेदरम्यान ज्या सामान्य माणसांनी आपल्या कौशल्याने मला समृद्ध केले, त्या सर्वांचा हा गौरव आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे असून, यासाठी विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डॉ. गुप्ता यांची निवड केली. या निवड समितीमध्ये डॉ. रूपा शाह, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री आणि डॉ. अंकुशराव कदम यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविकातून चव्हाण सेंटरच्या गेल्या चार दशकांतील कार्याचा आढावा घेतला आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी सेंटर कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त नामदार श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी डॉ. गुप्ता यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. गुप्ता यांनी सुचवलेली 'गावे वेबसाईटद्वारे जोडण्याची संकल्पना' आपण स्वतःच्या मतदारसंघापासून राबवण्यास सुरुवात करू, असे त्यांनी जाहीर केले. यशवंतराव चव्हाण हे नेहमीच विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा विचार करत असत आणि तोच वारसा सेंटर पुढे चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला डॉ. अनिल काकोडकर, विवेक सावंत, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अदिती नलावडे, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, निर्मला सामंत-प्रभावळकर, लक्ष्मणराव ढोबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.
मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षणातील मूल्यांकन पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सोळावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी आयोजित केलेल्या या परिषदेला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०: मूल्यांकनाच्या नव्या दिशा' या विषयावर आधारित परिषदेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी, नव्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, मूल्यांकनातील धोरणात्मक बदल आणि तंत्रज्ञानाची भूमिका याबाबत परिषदेदरम्यान सखोल चर्चा घडून आली. परिषदेच्या सुरुवातीस मानद कार्यक्रमप्रमुख दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेचे प्रास्ताविक मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षण विकास मंचाच्या कामाचा आलेख सांगून शिक्षणातील मंचाची भूमिका स्पष्ट केली.
शिक्षण परिषदेची भूमिका स्पष्ट करताना, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रिया सुळे यांनी 'गुण देणे म्हणजे मूल्यांकन नव्हे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा प्रवास समजून घेणे म्हणजे मूल्यांकन होय' असे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वास्तवावर भाष्य करताना सांगितले की, मूल्यांकन हे केवळ गुणांकनाची प्रक्रिया नाही. मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास, त्यांची जिज्ञासा, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल विकास घडविणारी प्रक्रिया आहे.
आजच्या विद्यार्थ्यांवर स्पर्धेचा अतिताण आहे. पालकांच्या अपेक्षा मुलांवर मानसिक दडपण निर्माण करतात. मुलांनी सर्व काही शिकायलाच हवे, ही अपेक्षा शिक्षणविरोधी ठरते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता वेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या वेगाने प्रगती करतो. गुणांपेक्षा क्षमता आणि मूल्याधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे आहे.
तंत्रज्ञान आणि अल्गोरिदमच्या वाढत्या वापरासंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक विचारशक्ती विकसित करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणातील प्रयोगांची नोंद आणि त्याचे परिणामकारक मूल्यांकन करणे ही भविष्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या परिषदेचे बीजभाषण एमकेसीएलचे मुख्य मेंटॉर विवेक सावंत यांनी केले. बीजभाषणात त्यांनी मूल्यांकन वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे, असून तिच्या व्यापक संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी स्पष्ट केले की, पारंपरिक शिक्षणपद्धतीत गुण म्हणजेच शिक्षण आणि निकाल म्हणजेच प्रगती असा संकुचित दृष्टिकोन तयार झाला होता. मात्र, NEP २०२० नुसार मूल्यांकन आता सतत चालणारी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील बदलांची नोंद घेणारी आहे. हे शिक्षक-विद्यार्थी संवादाचे सक्षम साधन अशी नवी ओळख यामुळे प्राप्त करून देत आहे.
त्यांनी PARAKH, HPC, कौशल्याधारित मूल्यांकन आणि बहुआयामी प्रगती मूल्यांकनाची माहिती दिली. त्यांचे एक अत्यंत प्रभावी विधान परिषदेत लक्षवेधी ठरले, ते म्हणजे, 'जेव्हा गुण हेच ध्येय ठरते, तेव्हा शिक्षणाचा मूक बळी जातो.' शिक्षण अनुकरण → अनुसरण → अनुसर्जन या प्रवासातून घडते, असा अनुभव त्यांनी सांगितला.
या परिषदेत “डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेते किशोर मोतीराम भागवत (बुलढाणा) आणि विजया शरद किरमीरवार (आनंदवन, भामरागड, गडचिरोली) यांना नवोपक्रमशील अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षणकार्यामुळे गौरविण्यात आले. डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार रती भोसेकर लिखित 'बालशिक्षण-एक अद्भुत सफर' या ग्रंथाला मिळाला. 'नाविन्यातून नैपुण्य', 'फुलताना', 'उन्नती – समावेशित शिक्षणाची' या पुस्तकांना लक्षवेधी शैक्षणिक ग्रंथ म्हणून गौरविण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांकडून गौरव करण्यात आला.
मूल्यांकनाचे नवे प्रयोग सादर करताना डॉ. मिलिंद नाईक यांनी ज्ञानप्रबोधिनीतील मूल्यांकन प्रयोगांची माहिती दिली. त्यांनी अनुभवाधारित शिक्षण आणि स्वमूल्यांकन यांचा शैक्षणिक परिणाम अधोरेखित केला. डॉ. विशाल पाजणकर यांनी एनसीईआरटी, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनात काय काम केले जात आहे, याचे सादरीकरण केले. PARAKH ची संकल्पना, राष्ट्रीय मूल्यांकन चौकट आणि बहुमितीय कौशल्य मूल्यांकन याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले.
डॉ. राजेंद्र मोरे (रयत शिक्षण संस्था) यांनी संस्थात्मक पातळीवरील मूल्यांकन उपक्रम मांडले. परिषदेला उपस्थित असलेल्या शिक्षकांनी खुल्या चर्चासत्रात ग्रामीण-शहरी मूल्यांकनातील भेद, शिक्षक प्रशिक्षणाची आवश्यकता आणि डिजिटल साधनांचा जबाबदार वापर यावर मुद्दे उपस्थित केले. डॉ. विकास गरड, बसंती रॉय आणि ऐनुल अत्तार यांनी या सत्राला मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन अरविंद शिंगाडे आणि सोमनाथ वाळके यांनी केले. उपस्थित शिक्षकांनी ही परिषद शिक्षण व्यवस्थेला नवा बौद्धिक वेग देणारी ठरली आहे, असा विश्वास व्यक्त केला.
समारोप सत्रात डॉ. वसंत काळपांडे आणि धनवंती हर्डीकर यांनी परिषदेतील मुद्द्यांचा आढावा घेऊन, ही परिषद केवळ कार्यक्रम नव्हे तर शिक्षण व्यवस्थेतील नव्या मूल्यांकनाला दिशा दाखवणारी आहे, असे प्रतिपादन केले. परिषदेतील उपस्थितांचे आभार योगेश कुदळे यांनी व्यक्त केले, तर निवेदन मच्छिंद्र बोऱ्हाडे आणि अचला मचाडो यांनी केले.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारात एक पुरुष आणि एक महिला शिक्षक यांची निवड केली जाते. सन २०२५ चा हा पुरस्कार बुलढाणा येथील किशोर मोतीराम भागवत आणि गडचिरोली येथील विजया शरद किरमीरवार यांना जाहीर करण्यात आला आहे. किशोर भागवत हे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, हिवरखेड, ता. खामगाव (बुलढाणा) येथे कार्यरत आहेत, तर विजया किरमीरवार या लोक बिरादारी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड (गडचिरोली) येथे सेवा देत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत येत्या ४ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
किशोर भागवत हे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे आणि रंजक व्हावे म्हणून सातत्याने प्रयोगशील राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिकण्यासाठी अॅलेक्सा, अल्फाबेट रॅक, अक्षर टोप्या, निधी बँक यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कोविड काळातील ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांनी राज्यातील युट्यूबर शिक्षकांची ‘टीच-ट्यूबर’ नावाची चळवळ उभी केली. तंत्रज्ञानाबरोबरच त्यांनी आपल्यातील साहित्यिक कलेचा वापर शिक्षणात केला आहे. विविध नियतकालिकांमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतून कविता आणि लेखन ते करतात. कॅनडा येथे प्रकाशित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधिक कविता संग्रहात तसेच इंग्रजी जर्नलमध्ये त्यांच्या इंग्रजी कविता प्रकाशित झाल्या आहेत. लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास घडवण्यासाठीचे त्यांचे विशेष प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांच्या शैक्षणिक धडपडीची दखल मिपा या संस्थेने घेतली होती.
विजया किरमीरवार या हेमलकसा येथील आश्रमशाळेत मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘३६५ दिवस सुरू असणारी शाळा’ अशी या शाळेची ख्याती आहे. त्या गणित विषयाचे अध्यापन करतात. गणिती खेळ, खरी कमाई, गणिती शब्दकोडे, गणित बाजार यांसारखे मुलांच्या आवडीचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. गणित संबोध प्रशिक्षणात त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे. मैदानी खेळ, बागकाम, भाजीपाला आणि शेतीकाम यातून विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. अत्यंत दुर्गम भागात असूनही शैक्षणिक जनजागृती आणि विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात. विजया किरमीरवार यांच्या कामाची दखल घेऊन ‘आदिवासी प्रकल्प विभाग, भामरागड’ यांच्यावतीने त्यांना ‘इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.
मा. भाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीत दत्ता वारे, अरविंद शिंगाडे, तुषार म्हात्रे, आनंदा आनेमवाड, अप्पा सावंत, वैभव तुपे, जगदीश कुडे यांसारख्या कर्तबगार शिक्षकांचा समावेश आहे. या समितीने राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षण अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शिफारशी मागवल्या होत्या. अनेकांकडून आलेल्या शिफारशीची छाननी करून, मुलाखती घेऊन आणि प्रत्यक्ष शाळाभेटी देऊन पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.