स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
पुणे -यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'अभिसरण' या उपक्रमांतर्गत विदर्भातील युवक-युवतींना पाच गटांत विभागून सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत पाठविण्यात आले. दिनांक ९ मे २०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा समारोप काल दिनांक १९ मे २०२३ रोजी झाला. या समारोप कार्यक्रमास चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
या उपक्रमा दरम्यान सर्व युवांची प. महाराष्ट्रातील परिसर फिरण्याची जिद्द, सर्व विषय जाणून घेण्याची जिज्ञासा, सर्व युवांनी दाखविलेला उत्साह याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे कौतुक केले. उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, लोकांना या उपक्रमाबद्दल आता कुतुहल वाटते ही जमेची बाजू आहे. आज या सर्व मुलांचे अनुभव ऐकून समाधान वाटले. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक कसा करता येईल यावर आपण सर्वजण मिळून काम करूया.
यशवंतराव चव्हाण सेंटर मार्फत मागील चौदा वर्षापासून 'अभिसरण - युथ एक्सचेंज प्रोग्राम ' आयोजित करण्यात येतो. यावर्षी विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र ही संकल्पना होती. या माध्यमातून विदर्भातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्र समजून घेता आला. प्रत्येक जिल्ह्यातील संस्कृती, विविध परंपरा, चालीरीती, त्या भागातील इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न सहभागी युवांनी केला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जीवनमान समजावून घेतले. यामध्ये शेती व प्रमुख पिके, भौगोलिक वैशिष्ट्ये, ऐतिहासिक वारसा व परिसरातील व्यक्तिमत्त्वांची ओळख आदींची माहिती या मुलांना मिळाली.
याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सीईओ दिप्ती नाखले, दत्ता बाळसराफ, निलेश राऊत, संतोष मेकाळे, प्रा. रंजीत बायस, डॉ. अमित नागरे, भूषण काळे, प्रदीप मोहिते, अमेय पवार, रवी कांबळे, आशुतोष मोरे, अभिसरण उपक्रमाचे समन्वय आदी उपस्थित होते.
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या २२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कृषी, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करायचे राहून गेले असल्यास पुढील दहा दिवसात अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे.
पुरस्कारासाठी अर्ज आणि त्यासंबंधी अटी जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले असून या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात असणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक अनोखी सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त उद्योजकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
याअंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी लागणारे परवाने काढून देण्यासाठी धायरी येथे एका खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली. याद्वारे आपल्या उद्योग व्यवसायाला नवी दिशा देण्याची मोठी संधी पुण्यातल्या उद्योजकांना मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्यम, एमएसएमई रजिस्ट्रेशन, एफएसएसएआय रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट आणि ट्रेडमार्क मिळवून देण्यात येणार आहे.
व्यावसायिकांना या विविध परवान्यांची नितांत गरज असते. हे सर्व परवाने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून सुलभपणे मिळवता येतील. त्याचबरोबर छोट्या उद्योजकांना यासाठी खास सवलतही देण्यात येणार आहे.
परवाने आणि इतर गोष्टींकडे उद्योजक फारसे लक्ष देत नाहीत. परिणामी नंतर उद्योग वाढविण्यासाठी, कर्ज मिळविण्यासाठी परवाने नसणे हे त्यांच्यासाठी मोठा अडसर ठरते. हे टाळायचे असेल, व्यवसायात मोठी झेप घ्यायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गाने न जाता त्यात बदल करत, नव्या गोष्टी शिकत पुढे जाण्याची गरज आहे. त्यामुळे उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.
‘देआसरा फाउंडेशन’ हे ना नफा तत्वावर गेल्या १० वर्षांपासून उद्योजकांच्या मदतीसाठी काम करत असून आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त उद्योजकांना त्याचा लाभ झाला आहे. समाजात उद्योजकता वाढावी, नवे रोजगार निर्माण व्हावेत, हे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. या उद्देशानेच प्रख्यात सॉफ्टवेअर कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केली आहे, असे त्या।म्हणाल्या.
धायरी येथील बंडुजी खंडोजी चव्हाण महाविद्यालय, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी याठिकाणी येत्या बुधवारी (दि. ३ मे) सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून अधिक माहितीसाठी ९९२१५७२७७० या क्रमांकावर संपर्क साधावा.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.