स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली. एकूण चार ज्येष्ठ नागरिक आणि एक ज्येष्ठ नागरिक संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून येत्या ८ ऑक्टोबर रोजी चव्हाण सेंटर, मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. रत्नागिरी येथील रेखा रवींद्र बागुल, कल्याण येथील मीनल मतीमनोहर ठाकोर, रत्नागिरी येथील डॉ. श्रीरंग कद्रेकर, नवी मुंबई येथील अण्णासाहेब टेकाळे यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ठाणे येथील ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद व परिसर यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून निस्वार्थपणे काम करत समाजाच्या जडण घडणीमध्ये योगदान देणाऱ्या या चार ज्येष्ठांना व एका ज्येष्ठ नागरिक संघास पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत; त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ देखील आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे,असे त्यांनी नमूद केले.
मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारासाठी’ अर्ज करण्याचे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे.
या पुरस्कारासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पुरस्काराची रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२३ आहे, अशी माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
दरवर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध विभागासाठी जाहीर करण्यात येणार आहे. तरी यावर्षीच्या पुरस्कारासाठी कोकण विभागाची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, आणि मुंबई उपनगर, या जिल्ह्यातील अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती खा. सुळे यांनी दिली.
पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. या वेबसाईटवर उपलब्ध फॉर्म डाउनलोड करून अर्ज सादर करता येतील.
मुंबई- थोर साहित्यिक, कविवर्य ना.धों. महानोर यांचे निधन झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा त्यांना प्रेमळ सहवास लाभला. शरदचंद्रजी पवार साहेबांचे ते दीर्घकाळ सहकारी राहिले.
महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी त्यांची ओळख करून दिली जाते. अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे त्यांचे गाव. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.पण ते रमले शेतीतच...!
अतिशय तरल सामाजिक जाणीव असणारा निसर्गकवि, बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही आवडीने ऐकली जातात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख आहे. त्यांच्या निधनामुळे निसर्गाच्या समवेत राहून शेती माती आणि निसर्ग संस्कृतीसाठी कटिबद्ध असणारा साहित्यिक हरपला.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.