स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२४ वर्षासाठी हे पारितोषिक कृषि औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान- तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे.
रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून त्यासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित नमुन्यात सुचविण्यासाठी व पारितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईट, मुंबई ४०००२१ या पत्यावर किंवा
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यासाठीच चव्हाण सेंटरच्या वतीने त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया, लोकहितवादी मंडळ, प्रा. एन्. डी. पाटील आदी मान्यवर तसेच संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील या फेलोशिप अंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाणार आहे.
कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर इच्छुकांनी १८ जुलै ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करावेत. १८ ऑक्टोबर २०२४ नंतर स्वीकारले जाणार नाहीत. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तपासणी होऊन निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ साठी १२ तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण १२२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना सन्मानपूर्वक फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळाल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व फेलोंचे आभार मानले असून तिन्ही वर्षी फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. निवड झालेले सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ‘आदिवासी विकास केंद्रा’तर्फे महाराष्ट्रातील आदिवासींच्या समस्यांवर एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचा मुख्य उद्देश आरोग्य, पोषण आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करणे, आदिवासी ग्रामसभांना सक्षम बनवणारे दोन महत्त्वाचे कायदे- आदिवासी व इतर वन परंपरागत वन निवासी वन हक्क कायदा आणि पेसा यांच्या अंमलबजावणीतील आव्हाने, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित आव्हाने आणि आदिवासी ओळख आणि संस्कृतीचे प्रश्न या विषयावर सहभागींनी अनेक गट चर्चेत भाग घेतला आणि ग्राउंड रिॲलिटी सुधारण्यासाठी त्यांचे अनुभव आणि अपेक्षा मांडल्या.
दिवसाच्या उत्तरार्धात माजी कृषी मंत्री आणि राज्यसभा सदस्य मा. श्री शरद पवार जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि श्री. नाना पटोलेजी, प्रदेशाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांनी समुदायांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सरकारशी संवाद स्थापित करण्यासाठी आवश्यक तेथे मदत करण्यास वचनबद्ध केले.
श्रीमती प्रतिभा शिंदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले, तर इतर विविध सदस्यांनी गटातून उद्भवलेल्या चर्चेचे सादरीकरण केले. दिलीप गोडे यांनी समारोप करून कार्यक्रमाची सांगता केली. डॉ.किशोर मोघे, ॲड. इंदवी तुळपुळे आणि ॲड पूर्णिमा उपाध्याय यांनी आरोग्य, एफआरए आणि पेसा या विषयांवर भाष्य केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ श्रीमती दिप्ती नाखले आणि श्री दत्ता बाळसराफ, विश्वस्त श्रीमती फरीदा लांबे हे देखील उपस्थित होते. सादरीकरण करणाऱ्यांमध्ये डॉ. अभय शुक्ला, ॲड.ब्रायन लोबो, सुश्री उलका महाजन, शांताराम भडगुजर, श्रीमती कुसुम आलम, डॉ.चंद्रकांत बारेला यांचाही समावेश होता. गडचिरोली येथील माजी आमदार नामदेव उसेंडी हे देखील या अधिवेशनाला उपस्थित होते. विवध भागातील पंचायतराज व्यवस्थेतील प्रतिनिधी व आदिवासी स्वतः मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.