Home
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
पुणे, दि. २३ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सामाजिक, साहित्य, कृषी, उद्योजकता, पत्रकारिता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रात उल्लेखणीय कार्य केलेल्या सहा यशस्विनींना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आज पहिला यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे उपस्थित रहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. इतकेच नाही, तर महिलांसाठी कार्य करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आजच्या या कार्यक्रमात कुरखेडा, जि. गडचिरोली येथील शुभदा देशमुख यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत 'यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. तुळजापूर येथील गोदावरी डांगे यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल 'यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कारा'ने तर महाड येथील उद्योजिका शीला साबळे यांना 'यशस्विनी उद्योजकता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. 'यशस्विनी साहित्य पुरस्कारा'ने प्रख्यात लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना तर पत्रकार जान्हवी पाटील यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महिलांसह पुरुष कबड्डीपटू घडविणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक सिमरत गायकवाड यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षण सन्मान पुरस्कार' देण्यात आला.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित रहात खासदार सुळे यांनी, महिलांसाठी पहिले महिला धोरण पवार साहेबांनी २२ जून १९९४ साली आणले होते. या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे म्हणूनच याच तारखेला हे सन्मान केले जात असल्याचे स्पष्ट केले. महिलांनी निर्णय प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शाहू फुले आंबेडकर यांनी महिलांसाठी महत्वाचे कार्य केले आहे. महिलांना मिळालेले अधिकार पुरुषांमुळेच मिळालेले आहेत. त्यामुळे महिलांसाठी काम करणाऱ्या पुरुषांनाही पुढील वर्षापासून पुरुषांनाही सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ आ. ह साळुंके यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलांचा दाखला देत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या महिला कोणत्याही क्षेत्रात कमजोर नाहीत, असा त्यांचा गौरव केला. महिलेला कमी लेखण्याची आपल्या देशाची परंपरा अनाठायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार फाैजिया खान, वंदना चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी महापाैर प्रशांत जगताप, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र सचिव अंकुश काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते. अत्यंत हृद्य असा झालेल्या कार्यक्रमात पुरस्काराला उत्तर देताना शुभदा देशमुख यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. या पुरस्काराने आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगत त्यांनी काम करण्यास अजून बळ मिळाल्याचे नमूद केले. याप्रसंगी, शीला साबळे, गोदावरी डांगे, मनस्विनी लता रवींद्र, सिमरत गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. गौरव मालक आणि निकिता बहिरट या तरुण विद्यार्थ्यांनी अत्यंत ओघवत्या शब्दात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
पुणे, दि. १२ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'यशस्विनी सन्मान' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून येत्या २२ जून रोजी पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवसाचे महत्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून खासदार शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपास्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. शुभदा देशमुख (कुरखेडा, जि. गडचिरोली) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', विविध विषयांवर नाटक, मालिका यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या मनस्विनी लता रवींद्र (पुणे) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवून शेतीमालास योग्य तो भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोदावरी डांगे (तुळजापूर, उस्मानाबाद) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवनाऱ्या जान्हवी प्रसाद पाटील (कोल्हापूर, सध्या ठाणे) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या शीला साबळे (महाड, रायगड) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान', कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या सिमरत गायकवाड (डोंबिवली, ठाणे) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा २८ वर्ष पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा 'यशस्विनी' मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असे त्यांनी नमूद केले.
मुंबई, दि ५ (प्रतिनिधी) - केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा लागू करताना शिक्षण हक्क कायदा २००९(आरटीइ)ची योग्य व पारदर्शकरित्या अंमलबजावणी होणे जरुरीचे आहे तसेच मुक्त ग्रंथालये, अभ्यासिका, जास्तीत जास्त प्रमाणावर स्थापन करणे आवश्यक असल्याचे मत तरुण आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी मांडले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा जाहीर केला आहे. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नव-नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर देशभरातील तरुणांची मते मागवली आहेत. याच बाबींवर राज्यातील युवक युवतींची मते जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सहा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यातील शेवटचे चर्चासत्र शनिवारी (दि.४) यशवंतराव चव्हाण सेंटर ,मुंबई येथे पार पडले. या चर्चासत्रात राज्यातील वीसहून अधिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांनी सहभाग घेतला.
शिक्षणावर खर्च करताना निधी वाढवला पाहिजे आणि दरवर्षी त्यात वाढ होणे गरजेचे आहे असे मत मांडण्यात आले. युवा नेतृत्व विकासावर बोलताना तळागाळातील तरुणांना सामाजिक, राजकीय पातळीवर संधी मिळावी त्यासाठी युवाकट्टा तसेच युथ कौन्सिलची स्थापना करावी तसेच लोकल सेल्फ गव्हर्नन्स मध्ये युवकांना संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी विद्यापीठ पातळीवर निवडणूका पुन्हा सुरू करणे असे मुद्दे प्राधान्याने मांडण्यात आले.
आरोग्यावर बोलताना युवांनी मानसिक आरोग्या बाबतीत चिंता व्यक्त केली व त्याला अनुसरून प्रत्येक शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य सल्लागाराची नेमणूक करावी, क्रीडा विषयाची युवकांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी क्रीडा संकुल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात यावे तसेच केंद्र सरकारच्या 'खेलो इंडिया' या उपक्रमात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत वाढवण्यात यावी, असे सुचवण्यात आले.
सामाजिक न्यायाबद्दल युवक LGBTQ प्रवर्गाला समाजात समान स्थान मिळण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांना संरक्षण देणे आदी प्रमुख मागण्या होत्या. रोजगार व उद्योजकतेबाबत MSME च्या अंतर्गत सुलभ कर्ज योजना तसेच 'समान काम समान वेतन' असलेच पाहिजे, ग्रामीण भागातील 'मनरेगा' सारख्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे आदी मागण्या मांडण्यात आल्या. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था, सामाजिक महाविद्यालये, युवक चळवळी, NSS, NYK चे प्रतिनिधी तसेच इतर युवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, आरोग्य, दिव्यांग व , पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई , महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३ जानेवारी रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध लक्षात घेता सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.