
- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
अविनाश पोईनकर हे आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी या छोट्याशा गावातून येतात. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, अभावग्रस्ततेत संघर्ष करत त्यांनी प्रथितयश युवा कवी, लेखक, मुक्तपत्रकार आणि आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून अल्पावधीत ओळख निर्माण केली.
विद्यालयीन जीवनातच लेखनाला सुरुवात करून, अध्यापक पदविका आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१७ साली 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला. यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारासह पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
'विमल गाडेकर: व्यक्ती आणि वाड्मय' या ग्रंथाचे संपादन, 'सुरजागड: विकास की विस्थापन?' हा नक्षलप्रभावित गडचिरोलीतील खाणग्रस्त आदिवासींचा संशोधन ग्रंथ, आणि लोकवाड्मय गृह प्रकाशित 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह – यांतून गडचिरोली-अभूजमाड-दंडकारण्यातील ज्वलंत मानवी संवेदना उजागर झाल्या आहेत. विविध मासिके आणि वर्तमानपत्रांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहेत.
'जागृत' संस्थेचे संस्थापक म्हणून चंद्रपूर-गडचिरोलीतील कोलाम आणि माडिया समुदायांसोबत जल-जंगल-जमीन प्रश्नांवर ते सध्या कार्यरत आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून घाटकुळ गावाला आदर्श स्मार्ट ग्राम बनवले. मागील दशकभर आदिवासी आणि भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांचा मागोवा घेत वंचितांचा आवाज प्रभावी करणारा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
अविनाश पोईनकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
मुक्त पत्रकार आणि लेखिका म्हणून १६ वर्षांहून अधिक अनुभव हीनाकौसर खान यांच्याकडे आहे. स्त्रियांच्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी संवेदनशील आणि नैतिक पत्रकारितेत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता केली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्या पारंगत आहेत.
२००८ ते २०१६ दरम्यान लोकमत मीडिया मध्ये रिपोर्टर आणि सब-एडिटर म्हणून काम करत असताना त्यांनी मदरशा शिक्षणातील बदलांचा अभ्यास केला. २०१९ ते २०२२ दरम्यान कर्तव्य साधना मध्ये सिनियर सब-एडिटर म्हणून काम करताना महिला आणि बालकांच्या मुद्द्यांवर विशेष कथा त्यांनी लिहिल्या आहेत.
त्यांच्या लेखणीतून अनेक कादंबऱ्या निर्माण झाल्या आहेत. अल्पसंख्याक मुद्द्यांवर आधारित ‘इज्तिहाद’, आंतरधर्मीय विवाहांवर आधारित ‘धर्मरेषा ओलांडताना’, ट्रिपल तलाकविरोधी संघर्षावर आधारित ‘तीन तलाक विरोधी पाच महिला’ यासह ‘इत्रनामा’ या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.
लाडली मीडिया फेलोशिप २०२४, साउथ आशिया लाडली अवॉर्ड २०२४, लोकमत मीडिया साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान फेलोशिप (२०२३), युनिसेफ चरखा फेलोशिप (२०१८) यांसारखे अनेक पुरस्कार आणि फेलोशिप्स त्यांनी मिळविल्या आहेत.
हीनाकौसर खान यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
कवी, गीतकार आणि गझलकार म्हणून ओळखले जाणारे वैभव देशमुख हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ या गावचे. तिथेच शेती-मातीच्या सहवासात वाढलेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबाद गाठल्यानंतर दहा वर्षे त्यांनी साईन बोर्ड आर्टिस्ट म्हणून व्यवसाय केला. अशा कष्टप्रद कामातून वेळ काढून साहित्य साधनेला प्राधान्य दिले. आणि 'तृष्णाकाठ' व 'हे सारे गुलमोहर माझे' हे कवितासंग्रह साकारले. यापैकी तृष्णाकाठ या संग्रहाला कुसुमाग्रजांच्या पुस्तकांच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा काव्य पुरस्कार’ तर गझललेखनासाठी “गझल उन्मेष पुरस्कार” पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.
६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'नाळ२' चित्रपटासाठी लिहिलेल्या 'भिंगोरी' गाण्यासाठी राज्य शासनाचा 'गदिमा उत्कृष्ट गीत पुरस्कार' त्यांना मिळाला. तर “कुण्या राजाची तू गं राणी” या शीर्षकगीतलेखनासाठी ‘मटा सन्मान’ प्राप्त झाला. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
रिंगण, नाळ, नाळ२, घर बंदूक बिरयानी, बापल्योक, झोंबिवली, जुनं फर्निचर, तेंडल्या, इलू इलू १९९८, सोयरिक, जारण यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आणि सातत्याने विविध चित्रपटांसाठी ते लेखन करीत आहेत. तसेच, बाजी, बापमाणूस, छोटी मालकीण, जुळता जुळता जुळतंय की, आई तुळजाभवानी, कुण्या राजाची तू गं राणी यासारख्या मालिकांसाठी लिहिलेली त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. कवी व गीतकार अशा नात्याने वैभव देशमुख यांची नाळ कविवर्य महानोरांशी जुळणारी आहे. वैभव देशमुख यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा.
वैभव देशमुख यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
ग्रामीण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुचिता खल्लाळ यांनी गावखेड्यातील लोकजीवन अनुभवत आपल्या काव्यप्रतिभेचा अवकाश समृद्ध केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी शिक्षक, त्यानंतर सरळ सेवा भरतीने 'शिक्षण विस्तार अधिकारी' म्हणून नांदेड जिल्हा परिषदेत त्या काम करत आहेत. नुकतेच एमपीएससी द्वारे उपशिक्षणाधिकारी, वर्ग-२ साठी त्यांची निवड झाली असून लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्रातील वाङ्मयीन नियतकालिकांतून, नामवंत दैनिके, दिवाळी अंकांमधून त्यांच्या कविता, समीक्षा, ललितलेखन प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता सदानिरा आणि वागर्थ या हिंदी नियतकालिकांत सुनीता डागा यांनी अनुवादित केल्या आहेत. तर बेबाक ऊर्दू मासिकात ऊर्दू अनुवादित कविता प्रकाशित झाल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अभ्यासक्रमात आणि देवगिरी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश झाला आहे. सुचिता यांनी लिहिलेल्या ‘स्त्री कवितेचं भान काल आणि आज' या समीक्षाग्रंथाचा मराठवाडा विद्यापीठात संदर्भसाहित्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
सुचिता खल्लाळ यांचे 'पायपोळ', 'तहहयात' आणि 'प्रलयानंतरची तळटीप' हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कविता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. बदलते स्त्री वास्तव चित्रित करणाऱ्या त्यांच्या कवितांमधील अल्पाक्षरी लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 'डिळी' ही त्यांची पहिली कादंबरी बहुकेंद्री असून, ग्रामीण व निमशहरी भागातील वास्तव प्रगल्भतेने रेखाटते. सध्याच्या काळात लोकांच्या जगण्याचे आयाम कसे बदलत आहेत हे मांडणारी त्यांची कादंबरी आहे. त्यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो, याच सदिच्छा !
सुचिता खल्लाळ यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: शेती-पाणी पुरस्कार
लग्नाच्या दुसऱ्याच वर्षापासून साधना यांच्या सासूबाईंनी शेतीची जबाबदारी संपूर्णपणे त्यांच्यावर सोपवली. शेतीतील म्हणावे एवढे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या सासूबाईंनी मात्र त्यांना सर्वकाही शिकवले. हि शेती करत असताना त्यांनी केळी, अळू , कारली, पडवळ, शिराळा, शहाळे, सुपारी हि पिके घेतली. जवळपास दहा वर्षे त्यांनी जोमाने शेती केली. परंतु सासुबाईंचे आजारपण आणि मुलांचा अभ्यास त्यामुळे शेतीकडे लक्ष कमी केले.
साधना ताईंचा सुखाचा संसार चालू होता. परंतु हे काळाला मान्यच नव्हते. २०२० साली त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्या धक्क्याने पाठोपाठ आठ दिवसातच त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले. दोन्ही भक्कम आधार गेल्यामुळे त्यांना आता पुढे काय? हा प्रश्न सतावू लागला. जिद्दी असणाऱ्या साधना ताईंनी खचून न जाता पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. घरात असणाऱ्या पुंजीतून त्यांनी आपले भांडवल उभा केले आणि पानवेल पुन्हा बहरू लागली. कालांतराने त्यांनी ठिबक सिंचन बसवले. त्यामुळे उत्पादनात भर पडली.
अडीच एकरात त्यांनी आपली शेती फुलवली. नारळ, सुपारी, कारली, गलका, पानवेल हि पिके त्यांच्या शेतात पिकतात. या शेतीच्या जोरावर त्यांनी मुलांचे शिक्षण केले. स्वत:चा उदरनिर्वाह केला. त्याचबरोबर अनेकांच्या हाताला काम देखील दिले. साधना ताईंची शेती उत्तरोत्तर अशीच बहरत राहो, याच सदिच्छा !
साधना वर्तक यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.