
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी कृषी सन्मान, District: कराड, सातारा
शेती आणि माती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी पिकवतो म्हणून आपण सकस अन्न खाऊ शकतो. जमिनीची सुपीकता, पाण्याची बचत, बीज निर्मिती या सगळ्याभोवती शेती हा विषय फिरतो. आपल्या शेतीतील पिकाचा दर्जा टिकून राहावा, मातीचा दर्जा टिकावा म्हणून गेली २५ वर्षे रासायनिक खतांचा वापर न करता भारती नागेश स्वामी यांनी शेती केली आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जा टिकून राहिला. “ज्या देशाची वरची चार इंच माती शाबूत आहे तोच देश जिवंत राहू शकतो या जॉर्ज कार्व्हर यांच्या वाक्याने प्रेरित होऊन भारती ताईंचा प्रवास चालू आहे. प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभोलकर सरांनी दिलेल्या ‘गणिती , हुकमी ,विक्रमी आपण प्रयोग करूया !’ या विचारांवर त्यांचा प्रवास चालू आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे बीद्र” ! शिक्षण जसे स्वावलंबी झाले पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी भारती ताई प्रयत्नशील आहेत.
बियाणांपासून ते मार्केटींगपर्यंत आपण स्वावलंबी कसे व्हावे? हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी ‘मोकाट कृषी विद्यापीठाची’ स्थापना केली. शेती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील मुलांना लहानपणापासूनच शेती आणि माती हा विषय समजून सांगण्यात त्या अग्रेसर आहेत. तसेच त्यांनी महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. ‘आधी केले नि मग सांगितले’ या विचारांच्या प्रेरणेतून बीज संकलन ,संवर्धन ,गुणन ,प्रचार ,प्रसार याद्वारे सेंद्रिय शेतीची सुरवात व्हावी या भावनेतून त्यांच्या शेतीचा जीवनप्रवास चालू आहे. “या विश्वाची समृद्धी व तृप्ती आमच्या या गावात आम्हाला मिळो.”अशी त्यांची इच्छा आहे.
शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या भारती नागेश स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2022, पुरस्कार प्रकार: यशस्विनी सामाजिक सन्मान, District: गडचिरोली, Youtube Video:
गडचिरोली जिल्ह्यात असलेलं कुरखेडा हे गाव आपलं कार्यक्षेत्र, नक्षलवाद्यांच्या रेड कॉरिडॉरची साक्ष देणारी शांतता! साने गुरुजींच्या पुस्तकांचा आपल्यावर विशेष प्रभाव. डॉ. गोगुलवार यांच्या साथीने आपण आयुष्याचा संसार तर मांडलातच पण त्याचबरोबर १९८२ साली 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी ' या संस्थेचीही सुरुवात केली. आपण संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात दिव्यांगांचे संघटन उभा केले. त्यामुळे सामूहिक शक्तीच्या जोरावर दिव्यांग आज आपले हक्क मिळवू लागले आहेत. आपली ही संस्था आदिवासी जनतेचे जणू कुटूंबच झाली आहे. आपण लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. वंचितांसाठी सुरु असलेले आपले हे कार्य पाहण्यासाठी देशभरातून संशोधक, अभ्यासक येत असतात. आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशस्विनी सामाजिक सन्मान" पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

- Awards Content:
- वर्ष: 2022, पुरस्कार प्रकार: यशस्विनी कृषी सन्मान, District: उस्मानाबाद, Youtube Video:
आपण तुळजापूर येथील रहिवासी. कमी वयात आपल लग्न झालं. लग्नानंतर अल्पावधीतच पतीचं निधन झालं. पदरी लहान मुल आणि समोर अडचणींचा डोंगर, परंतु अशा परिस्थितीत आपण खचून न जाता वेगवेगळ्या महिला बचत गटांशी जोडून महिलांना एकत्र केलं. आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि रोजीरोटीशी संबंधित विषयांवर काम करण्यासाठी आपण 'वुमन्स फेडरेशन' वा संस्थेची पायाभरणी केली. आपण सुरू केलेल्या 'वुमन्स फेडरेशन' संस्थेचे आजघडीला तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत. न्यूयॉर्क येथे २०११ साली भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महिलांविषयक परिषदेमध्ये सर्वसामान्य भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट! याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी २०१५ साली जपान येथे भरवलेल्या आपत्ती व्यवस्थापन विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेत देखील आपण सहभागी झालात.
'स्वयंशिक्षण प्रयोग' या संस्थेच्या माध्यमातून आपण कृषी क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून अखंडपणे काम करीत आहात. हवामानाशी सुसंगत शेती या विषयाच्या आपण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाता. आपण करत असलेल्या कार्यासाठी आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला वहिला 'यशस्विनी कृषी सन्मान' पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिलांच्या साथीने शाश्वत विकासासाठीचे हे आपले कार्य अविरत सुरु रहावे, याच सदिच्छा. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

- Awards Content:
- वर्ष: 2022, पुरस्कार प्रकार: यशस्विनी साहित्य सन्मान, District: पुणे, Youtube Video:
लहानपणापासून आपल्या लेखनासाठीचे पोषक वातावरण असणाऱ्या घरात आपला जन्म झाला. लेखक म्हणून आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात आपल्या लहानपणीच झाली आणि उत्तरोत्तर तो प्रवास 'दिल दोस्ती दुनियादारी' च्या टप्प्यावर पोहोचला. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमात लेखिका म्हणून आपण आपली वेगळी ओळख निर्माण केलीत. आपण लिहिलेली 'अमर फोटो स्टुडिओ', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही नाटक तरुणांच्या पसंतीस उतरली. 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'बन मस्का' या गाजलेल्या मालिकेतून आपण घरोघरी पोचलात. एकीकडे दिल दोस्ती सारख्या मालिका लिहून आपण तरुणांच्या मनातील भाव भावनांचा निचरा घडवून आणलात तर दुसरीकडे 'रमा माधव' या वेगळ्या धाटणीच्या ऐतिहासिक सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहून, ऐतिहसिक क्षणांना उजळणी करून दिलीत.
'आभाळाचे गाणे', 'सिगारेट अलविदा', 'ब्लॉगच्या आरशा पल्याड' ही आपली इतर साहित्यसंपदा! आपण लिहिलेल्या 'सिगारेट अलविदा' या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा तर 'ब्लॉगच्या आरशापल्याड' या पुस्तकास महाराष्ट्र शासन आणि साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार आपणास प्राप्त झाला. मालिका, सिनेमा ते साहित्य क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशस्विनी साहित्य सन्मान" पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आपला लेखनप्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, या सदिच्छा.