संपूर्ण देशात आता लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत आणि याच काळात मराठवाडा भीषण दुष्काळाला तोंड देतोय , निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती आहे. परंतु ते प्रश्न सजग नागरिक म्हणून आपण लावून धरायला हवे , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य प्रतापराव बोराडे , विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत , प्राचार्या डॉ.रेखा शेळके , सुहास तेंडुलकर , शिव कदम , डॉ.संदीप शिसोदे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना श्री.लोमटे यांनी महाराष्ट्रात आजवर पडलेल्या दुष्काळाचा आढावा घेतला व त्या त्या वेळी त्यावेळच्या सुधारकांनी व राज्यकर्त्यांनी दुष्काळाबाबत काय दूरगामी विचार केला होता याची मांडणी केली. यात प्रामुख्याने महात्मा फुले , महाराजा सयाजीराव गायकवाड , राजर्षी शाहू महाराज यांच्या कारकिर्दीचा समावेश होता. ' मराठवाड्याच्या दुष्काळाचा निवारणाचा सातत्याने विचार झाला निर्मूलनाचा आता व्हायला हवा ', असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक , विद्यार्थी , अभ्यासक उपस्थित होते. यावेळी मॅट्रिक एकांकिका सवाई नाट्य स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण पटेकर यांचा सत्कार आसाराम लोमटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध जाधव , विशाखा गारखेडकर , उमेश राऊत , अक्षय गोरे आदींनी परिश्रम घेतले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद