“गेल्या दहा वर्षात मराठी सिनेमामध्ये मोठा बदल झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम आणि तामिळी सिनेमाची जागा आता मराठी सिनेमा घेत आहे. यामुळे भारतीय सिनेमात मराठी सिनेमा पहिल्या स्थानाव आला आहे,” असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तथा पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित व नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स थिएटरमध्ये पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यात श्री. गोपालकृष्णन बोलत होते. या वेळी महोत्सवाचे संचालक अशोक राणे, अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक विकास देसाई, अ‍ॅनी कॅटलीग, अजित दळवी, सुजाता कांगो, सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, दासू वैद्य, रेखा शेळके, आयनॉक्सचे सिद्धार्थ मनोहर, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, मोहम्मद अर्शद, शिव कदम,डॉ.रेखा शेळके,नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. गोपालकृष्णन म्हणाले, “माझ्यावर व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याचा पगडा होता. साठच्या दशकात मी पुण्याच्या एफटीआयला प्रेवश घेतला. या ठिकाणी मराठी मुले दुर्मिळ होती. मराठी भाषा, नाटक, संगीत यांची महाराष्ट्रात एक मोठी परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमांना चांगला काळा आला आहे.” जयप्रद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. गोल्डन कैलास व पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराची घोषणा : पुढील वर्षीपासून महोत्सवात सर्वोत्कृष्ट सिनेमाला गोल्डन कैलास या नावाने संबोधण्यात येईल व जीवनगौरव पुरस्काराला पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने संबोधण्यात येईल अशी घोषणा महोत्सवाचे संचालक नंदकिशोर कागलीवाल यांनी केली. कासव, सिटीलाईट, नदी वाहते, साऊंड ऑफ सायलेन्स ठरले आकर्षण पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रविवारी (ता. 21) सांगता झाली. यात दिग्दर्शक हर्षल मेहता, पद्मविभूषण अधुर गोपालकृष्णन यांच्यासह महोत्सवात आलेल्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनीही प्रेक्षकांशी संवाद साधत आपला प्रवास उलगडला. चार दिवसीय या महोत्सवात औरंगाबादकरांना वेगळ्या धाटमीच्या सिनेमांचे रसग्रहण करता आले. नाथ ग्रुप, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम आणि प्रोझोन यांच्यावतीने हा महोत्सव घेण्यात आला. यंदाच्या महोत्सवात सुवर्णकमळ मिळालेला ‘कासव’, ‘सिटीलाईट’, ‘नदी वाहते’, ‘साऊंड ऑफ सायलेन्स’ यांसह इराणी आणि फे्ंरच सिनेमे आकर्षण ठरले. रविवारी सुटी असल्यामुळे सकाळपासूनच प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवासाठी नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे सचिव तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, समन्वयक नीलेश राऊत, उल्हास गवळी, प्रोझोनचे संचालक मोहम्मद अर्शद, जेट एअरवेजचे अहेमद जलील यांनी पुढाकार घेतला. निकाल पुढीलप्रमाणे : सर्वोत्कृष्ट सिनेमा : क्षितिज उत्कृष्ट ध्वनी संयोजन : पुप्पा बेस्ट एडिटींग : रुख उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : साउंड ऑफ सायलेन्स बेस्ट सिनेमॅटोग्राफर : रुख बेस्ट स्क्रीन प्ले : क्षितिज बेस्ट अ‍ॅक्ट्रेस : छाया कदम (रेडू) बेस्ट अ‍ॅक्टर्स : राहुल बॅनर्जी ( पुप्पा) उत्कृष्ट दिग्दर्शक : इंद्रसिस आचार्य स्पेशल मनेशन्स ज्युरी अ‍ॅवॉर्ड : वैष्णवी तांगडे (क्षितिज)

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद