'शंभर वर्षांनंतरही कवी विंदा करंदीकर महत्त्वाचे वाटतात. कारण, त्यांची कविता समकालीन आहे. कविता वाचताना जणू ती आजच्या गोष्टींबद्दल सांगते असे वाटते. त्यामुळेच स्वत:च्या जाणिवेशी एकनिष्ठ असणारा हा कवी श्रेष्ठ ठरतो,' असे प्रतिपादन कवी प्रा. दासू वैद्य यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वच्छंद ' कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित कार्यक्रम रविवारी गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी दासू वैद्य यांनी केले. यावेळी मंचावर डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. संजय मोहोड, वामन पंडीत आणि ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे उपस्थित होते. विंदांचे व्यक्तिमत्त्व आणि कवितेवर दासू यांनी भाष्य केले. 'समीक्षक, अनुवादक, कवी असलेले करंदीकर मराठी साहित्याला समृद्ध करुन गेले. त्यांचे मोठेपण शंभर वर्षांनंतरही टिकून आहे. मध्य प्रदेश सरकारने विंदांना कबीर सन्मान प्रदान केला होता. या पुरस्काराची रक्कम विंदांनी किल्लारी भूकंपग्रस्तांना दिली होती. प्रदेशाच्या पलीकडे जाणारी ही दानत होती' असे दासू म्हणाले.

विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन घडविणारा 'स्वच्छंद' कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. या कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची होती. निर्मिती, संकल्पना, नेपथ्य वामन पंडीत, संगीत माधव गावकर यांचे होते. वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी ताम्हनकर, माधव गावकर यांनी विंदांच्या आठवणींना उजाळा देत कविता सादरीकरण केले. 'तन मन धन अर्पाया देई चेतना' या कवितेने सुरुवात झाली. 'स्वेदाचीही ही अखंड गंगा' ही कविता नवीन पैलू उलगडून गेली. विंदांचे उपहासाने भरलेले, पण गंभीर आशयाचे चुटके दाद मिळवून गेले. शेक्सपीअर लिखित 'किंग लिअर'चे विदांनी भाषांतर केले होते. अतिरिक्त संतापाची ही शोकांतिका मराठीतही तेवढ्याच ताकदीने लिहिली गेली असे घाणेकर यांनी सांगितले. वैविध्यपूर्ण कवितांनी कार्यक्रम रंगत गेला. या उपक्रमासाठी सुबोध जाधव, गणेश घुले, महेश अचिंतलवार, श्रीराम पोतदार, श्रीकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद