यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक तर्फे ‘ सर्वसामान्य माणूस आणि भारतीय अर्थव्यवस्था ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन... नाशिक (दि. १४) : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या ‘ सर्वसामान्य माणूस आणि भारतीय अर्थव्यवस्था ’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मा. यमाजी मालकर १२० कोटी भारतीय नागरिकांच्या प्रामाणिक, समृद्ध आणि शांत जीवनासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्थक्रांती चळवळीत सक्रिय आहेत. अर्थक्रांती प्रतिष्ठानचे ट्रस्टी असून भारतीय लोकशाहीला आता चांगले प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करणार्‍या ‘ अर्थपूर्ण ’ या मासिकाचे संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. ‘ दिव्य मराठी ’ या दैनिकाचे सल्लागार संपादक म्हणून यापूर्वी त्यांनी काम केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ ड्रिम्स फ्रॉम माय फादर ’ या आत्मचरित्राचा याच नावाने त्यांनी मराठीत अनुवाद केला असून उद्योगपती करमचंद थापर यांच्या इंग्रजीतील चरित्राचा मराठीत अनुवाद केला आहे. तसेच ‘ डेटलाईन ’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. ‘ झपाटलेपण ते जाणतेपण ’ या पुस्तकाचे सहलेखक, ‘ मराठवाड्याच्या यशकथा ’ अशी ग्रंथसंपदा यमाजी मालकर यांच्या नावावर आहे. मा. मालकर यांनी दैनिक ‘ सकाळ ’ पुणे आणि औरंगाबाद आवृत्तीचे माजी संपादक म्हणून यशस्वी कारकीर्द पार पाडली असून पत्रकारितेत २६ वर्षे विपुल लेखन केले आहे. विशेषत: तरुणांसाठीचे ‘ युवास्पंदन ’ , कामगारांसाठीच्या ‘ कामगारांच्या जगात ’ , ग्रामीण भागातील विधायक बदलांविषयी ‘ तांबडं फुटतयं ’ , नव्या प्रश्‍नाची नवी उत्तरे शोधणार्‍या समाजातील प्रयोगशील माणसांविषयी ‘ उकल ’ , आणि नागरी प्रश्‍नांविषयी ‘ जागर ’ या गाजलेल्या सदरांचे लेखन त्यांनी केले असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक