सातारा जिल्ह्यातील फलटणचे मोरे घराणे हे वेणूताई चव्हाण यांचे माहेर… त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार झाले होते. त्यांना देशभक्ती, स्वातंत्र्य चळवळ या गोष्टीचा आदर होता,त्यामुळे त्यांनी लग्न करेन तर देशभक्तीसाठी वेड्या झालेल्या तरुणाशी, असा निश्चय केला होता. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या देशभक्त तरुणाशी लग्न करून त्यांनी तो निश्चय सत्यात उतरवला.

त्या दोघांचा विवाह २ जून १९४२ रोजी झाला. चव्हाण कुटुंबाच्या घराच्या उंबरठय़ावर ठेवलेले माप ओलांडून वेणूताईंनी पत्नी म्हणून प्रवेश केला, त्याच वर्षी ऑगस्ट क्रांती चळवळ उभी राहिली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात यशवंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अनेक दिवस तुरुंगात रहावे लागले. आयुष्यात आलेल्या खडतर परीस्थितीला तोंड देत वेणूताईंनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संसार समर्थपणे सांभाळला.

यशवंतराव चव्हाण यांना १९५२ साली मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते पसारा घेऊन वेणूताईंसह मुंबईला आले. पुढे चार वर्षांनी यशवंतराव मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकीय वाटचालीने वेग घेतला. त्यामुळे संसारासाठी वेळ द्यायला यशवंतरावांना आता जमणार नाही, याची वेणूताईंना जाणीव झाली. त्यामुळे मुंबईत आल्याबरोबर त्यांनी वृद्ध सासूबाईंसह सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. आणि कोणतीही कुरबूर न करता त्यांनी ती यशस्वीरीत्या पारही पाडली.

यशवंतरावांच्या सरकारी कामांत, राजकारणात वेणूताई कधी लक्ष देत नसत. यशवंतरावही वेणूताईंच्या कौटुंबिक व्यापांत अजिबात लक्ष घालत नसत. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी अभ्यासकांनी नोंदवून ठेवल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्यामधील पत्रव्यवहार हा तर मराठी भाषेतील एक अस्सल सहित्यप्रकार म्हणून पाहिला जातो. या पत्रातील भाषा आणि उभयतांमधील चर्चा सुद्धा वाचकांना समृद्ध करते.