यशवंतराव चव्हाण यांचे देहावसान दि.२५ नोव्हेंबर १९८४ रोजी २ रेसकोर्ड न्यू दिल्ली येथे वास्तव्यास असताना झाले. यशवंतरावजींचा फार मोठा ग्रंथ संचय होता. यशवंतराव चव्हाण सेंटर, विभागीय केंद्र कराड ‘विरंगुळा’ येथे साहेबांचा पत्रव्यवहार आणि इतर साहित्य (कागदपत्रे) विरंगुळ्यात आहेत. साहेबांच्या साहित्यावर पी.एच.डी. करू इच्छिणार्‍या व्यक्तींना सेंटरच्या पूर्व परवानगीने हे साहित्य दाखविले जाते.

काय आहे विरंगुळ्यात, असा प्रश्न अनेक जिज्ञासूना पडतो. विरंगुळ्यात देश विदेशातून साहेबांना पाठविलेली ८०२४ मूळ पत्रे आहेत. मूळ पत्र कॉम्प्युटरच्या सहाय्याने दाखविण्याची सोय विरंगुळ्यात आहे. साहेबांच्या संदर्भात वर्तमानपत्रातील १५८४ कात्रणे आहेत. भारतातल्या नामवंत साहित्यिकांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर लिहलेले लेख, तसेच साहेबांनी नानाविध ठिकाणी केलेली ६३७ भाषणे विरंगुळ्याच्या दफ्तरी आहेत. साहेबांनी मान्यवरांच्या पुस्तकाला दिलेल्या १६८ प्रस्तावनाही विरंगुळ्यात आहेत. साहेबांचे स्वतःचे ५१ लेख व चव्हाण साहेबांवर इतरांनी लिहिलेले १४२ लेख आहेत. भारतातील २५ विद्यापीठात दिलेली २५ भाषणे (दिक्षांत समारंभात) विरंगुळ्यात आहेत.

आता या भाषणांचे ‘विद्यार्थी मित्रांनो’ हे पुस्तकही चव्हाण सेंटरने प्रकाशित केले आहे. साहेबांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांनी केलेल्या १२० कविता संग्रहित आहेत. भारतातील नामवंत ६ विद्यापीठांनी साहेबांना डॉक्टरेट बहाल केली आहे. साहेबांच्या १५५ जन्मकुंडल्याही आहेत. करमाळा (जि.सोलापूर) येथील पाठक शास्त्रींनी साहेबांच्या केवळ हाताच्या ठशांवर लिहलेले भविष्य कथन आहे. साहेबांच्या हाताचे ठसे (मूळ स्वरूपात) विरंगुळ्यातच आहेत.

सौ. वेणूताई साक्षात देवता होत्या. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. दररोज त्या २०८ वेळा ॐ लिहायच्या आणि वही पूर्ण झाल्यावर ती गंगार्पण करायची, असा त्यांचा नियम होता. तीन वह्या आजही विरंगुळ्यात आहेत. ‘विरंगुळा’ हे साहेबांचे स्वतःचे निवासस्थान आहे.