दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच सामान्य जनतेच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध असणाऱ्या कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती यांविषयीची जनजागृती वेगवेगळ्या उपक्रम आणि कार्यशाळेच्या माध्यमांतून केली जाते. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून २००६ साली या विभागाची स्थापना झाली आहे. या विभागाचे संयोजक विजय कान्हेकर व दत्ता बाळसराफ यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक उपक्रम सहजगत्या पार पडतात.

मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी माणसाच्या मनाशी हितगुज करण्यासाठी "शोध आनंदी जीवनाचा" हा एक अनोखा उपक्रम राबवला जातो. तसेच दरवर्षी राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन केले जाते.

दिव्यांग प्रवर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी आणि या प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. एडीप (एडीआयपी) सारख्या केंद्र सरकारच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध वेगवेगळे उपक्रम राबिविले जातात आणि जिल्हा, विभागस्तरावर कार्यशाळा आयोजित करून व दर तीन वर्षानी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याचा आमच्यावतीने सातत्याने प्रयत्न केला जातो.

देशातल्या गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना चालू केली आहे. कानाने कमी ऐकू येणाऱ्या ज्येष्ठांसाठी उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. आम्ही आतापर्यंत सोळा हजार ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे.

आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक या संबंधित घेण्यात आलेल्या कार्यशाळेतून ज्या शिफारशी आल्या, ज्या सूचना आल्या त्या भारत सरकार आणि राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्याचे काम देखील आम्ही केले आहे.

समाजातील लोकांच्या आरोग्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांग यांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही त्यांच्यासोबत होतो,आहोत आणि यापुढे देखील त्यांच्यासोबत असू.

कार्यक्षेत्र समन्वयक

दीपिका शेरखाने- व्हटकर

कार्य क्षेत्र : 

आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक