यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जळगावचे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती पाणी या क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी सहा पुरस्कारांपैकी चार पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी, तर दोन पुरस्कार शेती व पाणी या क्षेत्रांसाठी असतील. त्यानुसार सन २०२६च्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्कारासाठी राज्याच्या सर्व विभागांतून शिफारशी मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराचे वितरण १७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येईल

कविवर्य ना. धों. महानोर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याची कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार सेंटरने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या नावाने पुरस्कार घोषणा केली.

पुरस्कारासाठी शिफारस करताना खालील बाबींचा विचार करावा हि विनंती :

१) शेती व पाणी व्यवस्थापन यात पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा मेळ घालून आणि पर्यावरणाचे भान राखून नाविण्यपूर्ण व प्रयोगशील पध्दतीने कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांची (महिला/पुरुष) शिफारस करण्यात यावी.

२) ना. धों. महानोर पुरस्कारासाठी नव्या पिढीतील शेतकरी, लेखक-कवींचा विचार करावा. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे.

३) ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार लेखक-कवीच्या एखाद्याच विशिष्ट पुस्तकाला द्यायचा नसून तो त्यांच्या आजवरच्या लेखनाची गुणवत्ता ध्यानात घेऊन द्यायचा आहे.

४) लेखक-कवींची गुणवत्ता त्यांच्या लेखनाच्या वाङ्मयीन मूल्यांच्या आधारे पाहिली जाते. अशा वाङ्मयीन गुणवत्तेबरोबरच ज्यांच्या लेखनाचा आशय मानवतावादी मूल्यांना छेद देणारा नसेल, तसेच धर्म, जात, प्रदेश, लिंग अशा कोणत्याही तत्त्वाच्या आधारे विषमतेचा पुरस्कार/स्वीकार करणारा नसेल, अशा लेखक-कवींच्या नावांचा ना. धों. महानोर पुरस्कारासाठी विचार होईल.

५) पुरस्कारासाठी शेतकऱ्यांची शिफारस करताना त्यांच्या कार्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये यांविषयी लिहावे.

६) पुरस्कारासाठी लेखक-कवींच्या नावांची शिफारस करताना त्यांची पुस्तके/कवितांच्या आशयाचे स्वरूप व वैशिष्ट्ये यांविषयी देखील लिहावे.

७) आपली शिफारस उशिरात उशिरा १० जुलै २०२६ पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरकडे https://forms.gle/mXfg4xer58Z84yNw6 या गुगल लिंकद्वारे भरून पाठवावी ही नम्र विनंती.