<>मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ‘आदिवासी विकास केंद्रा’तर्फे महाराष्ट्रातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर विशेष अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात आरोग्य, पोषण, अन्न सुरक्षा, शिक्षण, कौशल्य विकास आणि आदिवासी संस्कृतीचे जतन यांसोबतच ‘पेसा’ व ‘वन हक्क कायद्या’च्या (FRA) अंमलबजावणीतील आव्हानांवर गटचर्चांद्वारे जमिनी स्तरावरील वास्तव व अनुभव मांडण्यात आले. या प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदिवासी समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सरकारशी संवाद घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रतिभा शिंदे यांच्या सूत्रसंचालनाने व दिलीप गोडे यांच्या समारोपाने संपन्न झालेल्या या अधिवेशनात डॉ. किशोर मोघे, ॲड. इंदवी तुळपुळे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. अभय शुक्ला, उल्का महाजन आदी अभ्यासक-कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले; तसेच माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्यासह पंचायत राज प्रतिनिधी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.