ठाणे विभागाचा वार्षिक अहवाल ... यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे केंद्र, १ एप्रिल २०१७ पासून अस्तित्वात आले. त्यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर काव्यसंमेलन झाले. ठाणे प्रतिष्ठानने यशस्वी रितीने राबविलेले उपक्रम पुढीलप्रमाणे : २९ जुलै २०१६ रोजी ज्येष्ठ नाटककार श्री. अशोक समेळ यांची ज्येष्ठ कवी श्री. अशोक वागवे यांनी खुमासदार मुलाखत घेतली. यावेळी अशोक समेळांनी नटसम्राटमधील एक उच्चांकाचा प्रवेश करून दाखवला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुभाष शेंडे यांची मुलाखत प्रा. नितीन आरेकरांनी घेतली. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल व त्यांच्या कार्याचा परिचय ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. मनिष जोशी आणि प्रा. नितिन आरेकरसरांनी आपल्या व्याख्यानातून करून दिला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ३० सप्टेंबरच्या सायंकाळी मा. श्री. जी. वी. पिंगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील विविध क्षेत्रीतील ६ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौ. मृदुला दाढे जोशी सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात 'यशवंत व्याख्यानमाला' या उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमाची सुरूवात प्रसिध्द शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. श्री. अनिल काकोडकर यांच्या 'मुलभूत विज्ञानाच्या संशोधनाच्या नव्या दिशा' या व्याख्यानाने झाली. मुंबई विद्यापिठाच्या अखत्यारीतील असलेल्या महाविद्यालयातील सुमारे ५५० ते ६०० विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळाला. यावेळी पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अरूण साधू, प्रा. पु. द. कोडोलीकर संपादित अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ' यशवंतराव चव्हाण : जडण घडण' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी विचारकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त पहिल्या स्त्री राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांची खुमासदार मुलाखत प्रा. अनुया धारप व कु. पूजा प्रधान यांनी घेतली. या प्रदिर्घ मुलाखतीमुळे महिला वर्गाला श्रीमती नीला सत्यनारायण याचा प्रदिर्घ शासकीय अनुभवाची तसेच त्यांच्या साहित्यातील योगदानाची आणि त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. मुलाखतीनंतर सौ. माधवी घारपुरे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम रंगला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे