पुणे, दि. ०७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात देण्यात येणाऱ्या सन्मान पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून प्रसिद्ध माजी खासदार पद्मश्री अनु आगा आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी कवितालेखनाला अनुभव व अभिव्यक्तीचे एक नवे परिमाण उपलब्ध करून देणाऱ्या ‘ललददास्य ललबाय’ या कविता संग्रहाच्या लेखिका मीनाक्षी पाटील(मुंबई) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', स्वावलंबी शेतकरी महिला संघटना चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही कलावती सवंडकर(वर्धा) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', एकल स्त्रियांना सक्षमीकरणाकडे समर्थपणे घेऊन जाणाऱ्या तसेच हजारो स्त्रियांच्या शोषणाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलाची पहाट आणणाऱ्या रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या संध्या नरे पवार(मुंबई) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’,आपल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या राजश्री गागरे(भोसरी-पुणे) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’, शूटिंग एंड राइफल ट्रेनिंग क्षेत्रामधील निष्णात महिला प्रशिक्षक श्रद्धा नलमवार(नाशिक) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहाजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा 'यशस्विनी' मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.