स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांवरील वेबसाईटचे अनावरण चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या वेबसाईटवर यशवंतराव चव्हाण यांचा संपूर्ण जीवनपट आहे तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके, त्यांनी केलेली विविध भाषणे, विधीमंडळातील भाषणे, संसदेतील भाषणे त्याचबरोबर त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि मुलाखती देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर चव्हाण साहेबांनी जपलेली एकूण १.७० लाख मूळ कागदपत्रे तसेच चव्हाण साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत घेतलेले निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ या मासिकात प्रसिद्ध झाले होते. ते निर्णय देखील डिजिटल स्वरुपात वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होणार आहेत. एकूणच चव्हाण साहेबांचे कार्य जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांसह, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांना ही वेबसाईट महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी माहिती सतिश पवार यांनी दिली. याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, जेष्ठ मार्गदर्शक डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.नरेंद्र जाधव, अरुणभाई गुजराथी, हेमंत टकले, विवेक सावंत, अजित निंबाळकर, बी. के.अगरवाल, अदिती नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ च्या पुरस्कार सोहळ्यात हा सोहळा पार पडला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला तसेच महाराष्ट्राला केवळ कायदा आणि सुव्यवस्था स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासभिमुख व लोकाभिमुख प्रशासन अंमलात आणणे गरजेचे आहे. तेव्हाच परिपूर्ण प्रशासकीय व्यवस्था निर्माण होईल, हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब अग्रगण्य होते. हेच यशवंतरावांचे द्रष्टेपण होते. राजकीय काळातील निर्णय, विधिमंडळातील व संसदेतील भाषणे तिन्ही भाषेत ऑडीओ स्वरुपात वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच स्वत: चव्हाण साहेबांनी लिहिलेली पुस्तके तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित विविध लेखकांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत लिहिलेली पुस्तके, संपादित पुस्तके ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत. ही सगळी संपदा मोफत स्वरुपात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी मांडलेली मते तसेच चव्हाण साहेबांची दुर्मिळ छायाचित्रे या वेबसाईटवर पाहायला मिळतील.
महाराष्ट्र निर्मिती आणि वाटचाल यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब यांचे असलेले योगदान तसेच त्यांनी स्वत: लिहिलेली साहित्य संपदा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी विविध भाषेतील अनेक पुस्तके या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अशी माहिती ग्रंथपाल डॉ.अनिल पाझारे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जन्म, राजकीय कारकीर्द आणि संपूर्ण जीवनपट आजही प्रेरणादायी आहे. तसेच लोकराज्य या शासकीय मासिक मंडळाने प्रकाशित केलेला ‘विशेषांक’ही उपलब्ध आहे. त्यामुळे वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन, चव्हाण सेंटर तर्फे करण्यात आले आहे.
कोट - आपण आज चव्हाण साहेबांची एक नवीन वेबसाईट https://yashwantraochavan.in लाँच करत आहोत त्यामुळे कोणाला चव्हाण साहेबांची संपूर्ण माहिती हवी असेल तेव्हा कोणीही व्यक्ती या वेबसाईटच्या आधारे करु शकतो. चव्हाण साहेबांचे साहित्य, काम, भाषणे, दुर्मिळ कागदपत्रे त्यांची सगळी माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. ती माहीती आज मराठी भाषेत आहे. पण आगामी काळात ती हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध करुन दिली जाईल. -सुप्रिया सुळे
मुंबई : लोकांना विश्वासात घेऊन योग्य माहितीचा प्रसार केल्यास महामारीसारख्या साथीच्या रोगांवर मात करता येते हे कोरोना काळात सिद्ध झाले आहे, असा विश्वास वैद्यक क्षेत्रातील ख्यातकीर्त डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. सन २०२३ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली याचा मला मनस्वी आनंद होत आहे. क्षयरोग, बालरोग शास्त्र, एडस प्रतिबंध अशा वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंती कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना काळात सर्वच देशांनी लस संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली त्याचा चांगला फायदा झाला. निसर्गाचा मानवनिर्मित ऱ्हास अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण देतो. अशा वेळी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज असते.
पुरस्काराचे मानकरी ठरविण्यासाठी, विख्यात अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री हे सदस्य म्हणून काम पाहतात. रु. ५ लाख, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. डॉ. सौम्या स्वामिनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी डॉ. सौम्या यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, सौ. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका विषद करून चव्हाण सेंटरच्या तीन दशकातील कार्याचा मागोवा घेतला. तसेच सध्या चव्हाण सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाजाभिमुख योजनांची महिती उपस्थितांना दिली. चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे कार्य चव्हाण सेंटर कसोशीने आणि प्रामाणिकपणे करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार म्हणाले की, चव्हाण साहेब प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी कष्टाने शिक्षण घेतले. महाराष्ट्र राज्य प्रगती पथावर आणणे, हा त्यांचा ध्यास होता. विकासाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल, याची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचा विचार समाजात अखंड रुजेल, असा प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटर करत असते. ते पुढे म्हणाले की, कृषी मंत्री असताना डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या बरोबर काम करता आले. फलोत्पादनावर त्यांनी केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला, असे नमूद करून डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कन्या डॉ. सौम्या यांनी चव्हाण सेंटरचा हा पुरस्कार स्वीकारला याबद्दल आनंद प्रकट केला.
या प्रसंगी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे साहित्य व जीवनपट उलगडणाऱ्या नवीन परिपूर्ण संकेंतस्थळाचे (www.yashwantraochavan.in) लोकार्पण श्री. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सेंटरच्या सीईओ, दिप्ती नाखले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले तर सरचिटणीस श्री. हेमंत टकले यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी निवड समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत तसेच चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, विश्वस्त अजित निंबाळकर, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, जयराज साळगावकर, डॉ. प्रज्ञा पवार, शिक्षण तज्ज्ञ फरीदा लांबे, माजी महापौर विधी सल्लागार निर्मला सामंत-प्रभावळकर, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित भुरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ’ दिला जातो. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
चव्हाण सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन या बालरोगतज्ज्ञ आहेत. क्षयरोग, एचआयव्ही या क्षेत्रातील संशोधनात गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून त्या कार्यरत आहेत. भारत सरकारचे सचिव आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डॉ. स्वामिनाथन या अनेक संस्थांच्या राष्ट्रीय आणि जागतिक सल्लागार आहेत. स्वीडनमधील कॅरोलिंस्का विद्यापीठ आणि बोस्टन, यूएसए मधील टफ्ट्स विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्या सहायक प्राध्यापक आहेत. आरोग्यक्षेत्रात जागतिक पातळीवर भारताची पताका उंच फडकत ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.