स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई : समाजहितासाठी प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याची गरज आहे. या तिघांनी एकत्र काम केल्यास समाजव्यवस्थेचा हास होतो. भ्रष्टाचार वाढतो आणि अखेरीस समाजाचे मोठे नुकसान होते, असे प्रतिपादन 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत शरद काळे स्मृती व्याख्यानात 'प्रशासन, माध्यमे आणि राजकारण : नवे समीकरण' या विषयावर कुबेर बोलत होते. धर्मसत्तेकडून होणाऱ्या लैंगिक शोषणावर प्रहार करणाऱ्या 'स्पॉट लाईट' या चित्रपटातील एका प्रसंगाचा दाखला कुबेर यांनी दिला, चुकीच्या गोष्टी दडपण्यासाठी संपादकांवर माध्यम, प्रशासन आणि धर्मसत्तेने एकत्रपणे काम करण्यासाठी दबाव आणला जातो. पण, संपादक या तिघांनी एकत्रपणे काम न करता स्वतंत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे अत्यंत ठामपणे सांगतात. आज आपल्याकडेही याची निकड जाणवते. प्रशासनातून निवृत्त होऊन किंवा राजीनामा देऊन एखादा अधिकारी थेट निवडणूक लढवितो. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होताच एखाद्या लहान राज्याचे राज्यपाल होतात. एखादा पोलीस अधिकारी राजीनामा देऊन थेर निवडणूक रिंगणात उतरतो आणि एखाद्या वृत्तपत्राचा संपादक निवृत्त होताच राज्यसभेत सदस्र होतो, असे चित्र आपण सर्यर पाहतो. अशा अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांनी, संपादकांनी प्रामाणिकपणे, पारदर्शक काम केले असेल का, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही कुबेर म्हणाले.
भ्रष्टाचार केवळ आर्थिक नव्हे तर नैतिकही असतो, असे सांगताना प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासारखीच अवस्था माध्यमांतील मंडळींचीही झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी भूमिका कुबेर यांनी मांडली. समाज सर्व सरकारी आदेश खाली मान घालून ऐकतो, हा प्रश्न आहे. आपल्याकडे प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही, ही समाजव्यवस्थेचा हास झाल्याची चिन्हे आहेत, असेही कुबेर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख फरिदा लांबे यांनी केले. सुचित्रा काळे यांनी व्याख्यानामागील उद्देश स्पष्ट केला उपस्थितांचे आभार एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा बालापोरिया यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराय चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी केले.
मुंबई: वय हा केवळ एक आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या शब्दाऐवजी दुसरे नाव देता येईल का? याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असू शकते, कारण त्यांचा अनुभव येणाऱ्या नव्या पिढीसाठी महत्वाचा आहे, असे सांगतानाच आताचे जेष्ठ नागरिक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचाराचे आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले.
चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्यात राज्यातील काही ज्येष्ठ नागरिकांना "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान" देऊन गौरविण्यात आले. खासदार सुळे आणि वस्तू व सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्यात कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजी नगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर, मुंबई येथील सलमा खान यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' प्रदान करण्यात आला. तसेच, यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान लातूर येथील ज्येष्ठ नागरिक संघास प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, " वय हा केवळ आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. पवार साहेबांनी ६० व्या वर्षी पक्ष स्थापन केला. आताचे जेष्ठ नागरिक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचाराचे आहेत, ही खूपच कौतुकास्पद बाबा आहे. त्यामुळे वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या शब्दाच्या ऐवजी त्याला दुसरे नाव देता येईल का? याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असू शकते, कारण त्यांचा अनुभव येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचा आहे. अगोदरची पिढी अंधश्रद्धेच्या विरोधात होती, पण आम्ही आता परत उलटा प्रवास सुरु केला आहे. हे दुर्दैवी आहे. आपली संस्कृती, साहित्य आधीच्या पिढीने जपले आहे म्हणून हा कौतुक सोहळा होत आहे. तथापि कौतुक झाले म्हणून काम न संपवता ज्येष्ठांनी मार्गदर्शन करणे थांबवू नये. आपल्याला महाराष्ट्र पुन्हा योग्य मार्गावर आणायचा आहे."
विशेष आयुक्त नितीन पाटील म्हणाले, "तळागाळात जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम चव्हाण सेंटर करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेऊयात. त्यासाठी आपण पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक बदल घडविण्यासाठी एकत्र यायला हवे. ज्येष्ठ नागरिकांची वोटिंग पॉवर खूप आहे, त्याचा योग्य रीतीने वापर करा."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले यांनी केले. दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले, तर दीपिका शेरखाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट
ज्येष्ठांचा मार्गदर्शक'ची सुधारित आवृत्ती आली
चव्हाण सेंटरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'जेष्ठांचा पथदर्शक' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन या आनंद मेळाव्यात करण्यात आले. हे पुस्तक अनघा तेंडुलकर पाटील आणि ॲड. प्रमोद ढोकले यांनी लिहिले असून, सतीश पवार यांनी प्रकाशीत केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक विषयाची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
मुंबई, 27 सप्टेंबर: वडील भंवरलाल यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार असायचे तेव्हा तर जणू दुग्धशर्करा योग जुळून येत होता. शेतकऱ्यांचे जीवन उत्तम कसे होईल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसे हास्य फुलेल, यासाठी महानोर काम करत राहिले. ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. कविता, साहित्य, चित्रपटगीते लिहिताना त्यांनी शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य केले, असे गौरोद्गार जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
कविवर्य महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या दोन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवांना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी पालघर येथील साधना उमेश वर्तक, नंदुरबार येथील कुसुम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार तर चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर, बुलढाणा येथील वैभव देशमुख, मराठवाडा येथील सुचिता खल्लाळ, पुणे येथील हिना कौसर खान यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समारंभाच्या निमंत्रक चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, कविवर्य महानोर आणि पवार कुटुंबामध्ये असलेले चार दशकातील घनिष्ट नाते विचारात घेऊन ना. धों. महानोराचे कार्य पुढे नेण्याचा चव्हाण सेंटरचा प्रयत्न आहे. ना.धों. महानोर साहेबांची पूर्ण माहिती देणारी एक समग्र वेबसाईट तयार करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर महानोर यांचे वास्तव्य असणारे गाव एक स्मारक रुपात तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय, चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त विवेक सावंत, जैन फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.